भारताने विश्वचषक जिंकून दिवस गाजवला. सर्व टिम मधील खेळाडू, प्रशिक्षक, मॅनेजर्स, फिटनेस राखणारे, साधी कामे करणारे आनंदाने नाचले. स्टेडियमवर तर गणपती बाप्पा मोरयाचा गजर सुरु होता. भारताच्या राष्ट्राध्यक्षा प्रतिभा पाटील, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष राजेपक्षे, खा. राहुल गांधी, आमीर खान, मुकेश अंबानी, रजनीकांत, प्रीटी झींटा (आई गं) ई मान्यवर वेळात वेळ काढून वानखेडेवर खेळ बघताना टिव्हीवर दिसले. महेन्द्रसिंह ढोणीने कॅप्टन म्हणजे काय असतो हे दाखवून दिले. सचिन व वीरेन्द्र २० च्या आत परतल्यावर दडपणाखाली खेळत केवळ एकेक रन घेत त्याने व गंभीरने तीन आकडी लक्ष्याचे दोन आकड्यात रुपांतर कधी केले हे संगकाराला कळले नाही. शेवटी पॉवरप्लेमधे त्याने व युवराजने फोर आणि सिक्स दणकावत टप्पा सोपा केला. आपल्या विकेट्स राखल्या हे त्यांचे श्रेय. सचिनचा खेळ शेवटच्या मॅच मधे शतक झळकावणारा नसल्याने थोडी निराशा झाली. पण ६ विश्वचषक खेळलेला एकमेव भारतीय खेळाडू विश्वविजयी संघात आहे हे महत्वाचेच. सर्वांचे अभिनंदन. खास गॅरी कर्स्टन आणि व्यंकटेश प्रसाद या प्रशिक्षकांचे. भारतीय महासत्ता अशीच सर्व क्षेत्रांत विश्वविजयी होत राहो आणि त्यात सर्वांचा वाटा राहो ही सदिच्छा.
शनिवार, २ एप्रिल, २०११
मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०११
दळवी वि.मिस्त्री
एकाने राजकीय भाष्य केलेल्या नथुराम गोडसेचे काल्पनिक आत्मवृत्तपर नाट्य लिहिले, दुसर्याने (त्याच्यामते) मुंबईतील वास्तवदर्शी घटनांचा संदर्भ मागे ठेवून काल्पनिक पुस्तक लिहिले. दोघांना लोकांची पसंती मिळालेली विरूद्ध बाजूच्या लोकांना पचली नाही, आंदोलनाने दडपशाहीने म्हणा दोन्ही कलाकृती बंद झाल्या. पण इथे मेख आहे ती म्हणजे मिस्त्रीचे पुस्तक बाजारात उपलब्ध आहेच मात्र दळवींच्या नाटकासाठी नाट्यगृह उपलब्ध होणे अशक्य वाटतेय. फरक जर कुठे दिसला असेल तर तो दोघांना मिळालेल्या समर्थकांच्या "गटाचा". एकाचे समर्थक दुसर्याचे समर्थक का नाहीत?. भाषा अभिव्यक्ति स्वातंत्र्याची! पण लढा मात्र रुचणार्या किंवा विरूद्धांना ठेचणार्या अभिव्यक्तिपुरताच असे का?. महाराष्ट्रात टीकेला घाबरून जाऊन समाज घटकाने कच खाल्ली आहे अशी नोंद आहे का तुमच्याकडे? आपापले गट सांभाळणारे भित्रट अभिव्यक्ति स्वातंत्र्य दिले तरी त्याचा काय उपयोग करून घेणार, डोंबल? त्यांना अभिव्यक्ति स्वातंत्र्य नसले तरी चालेल पण विरूद्ध गटाचे तोंड शिवलेले हवे असते. अमेरिकेत मात्र जॉर्ज बूश यांची राजकिय विरोधकांकडून हत्या(की वध?) झाल्यानंतर काय काय घडेल ह्यावर चित्रपट येऊ शकतो. सर्वांगाने अशा काल्पनिक विषयामागील प्रेरणांचा मागोवा घेण्यासाठी केलेली चर्चा सिनेमाच्या माध्यमातून प्रदर्शीत केली जाते. तर मग गांधीवध(गांधीहत्या म्हणा हवे तर) ह्यासारख्या सत्यघटने मागील प्रेरणा दाबून ठेवण्याचे कारण जर तुम्हाला समजले तर जरा त्या दळवींना समजावा. गमतीची गोष्ट म्हणजे मिस्त्रीच्या मराठी(मिस्त्रीच्या भाषेत घाटी) लोकांना(आणि राजकिय नेत्यांना जसे की शिवसेनाप्रमुख, इंदिरा गांधी ई.) वाहिलेल्या शिव्यांना पदवी अभ्यासक्रमात तसेच ठेवा ह्यासाठी कळवळणारे "खरे मुंबईकर" दळवींच्या मागे झेंडे घेऊन का जात नाहीत? ठाण्याला मुंबईहून डायरेक्ट ट्रेन नाही आहे का की बसचे भाडे महाग आहे?
सोमवार, २४ जानेवारी, २०११
पुरावे सोडा
बिचारे दादोजी कोंडदेव. त्यांनी पुरावेच सोडले नाहीत हो? आता तर म्हणे रामदास स्वामी हे गुरु नसून "शिष्य" असल्याचा पुरावा मिळाला आहे त्यांना. म्हणजे पुरावा तसा तोच आहे पण आधी काही लोकांनी जो अर्थ काढला होता त्याच्या एकदम उलट अर्थ निघतोय असे तज्ञांचे मत असल्याचे वाचनात आले आहे. नाहीतर काय? अहो त्याच पुराव्यांवर निर्दोष सुटलेल्यांना जगात वरच्या कोर्टाने त्याच पुराव्यांवरून वेगळा अर्थ काढत शिक्षा दिल्याच्या घटना कदाचित ह्या लोकांनी मनात ठेवल्या असतील. असाच वादंग उठला होता त्या गॅलिलिओच्या काळात. त्याने त्याच पुराव्यांना मानून प्रमेय मात्र मांडले सत्ताधार्यांच्या मनाविरूद्धच. म्हणे पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी नाही. ह्या. असे होणारच नाही. पृथ्वी केंद्र नाही तर मग पृथ्वीवर केंद्रित सत्ता निर्माण करून जनतेवर राज्य ते कसे करायचे एवढा साधा प्रश्न ह्या मूर्ख गॉलिलिओच्या डोक्यात कसा आला नाही ? तरी त्याने नंतर आपली चूक सुधारत युद्धासाठी उपयोगी (तोफेचा अचूक मारा करण्यासाठी उपयुक्त) अशी प्रमेये शोधून काही उतारा मिळविला नाहीतर होतीच त्याची फाशी पक्की. तर सांगायचे काय की जर तुम्हाला या वर्तमानात बरे वाटत नसेल तुम्ही जग बदलण्यासाठी काही व्यक्ति, संस्था, चळवळी घडवत असाल तर मग एकच काम करा. ढिगभर पुरावे तासा तासाला सोडा की अमूक एक शिष्य. अमूक एक गुरु. अमूक एक असाच फुकटचा सोंड्या. नाहीतर काय होइल त्या सोंड्याची १५ वी पिढी असे मानेल की तोच गुरु आणि तुम्ही सोंड्या. मग? चालेल तुम्हाला? काय म्हणालात? फरक काय पडतो? अरे तुम्हाला नसेल फरक पडत (तुम्ही नसणार ना तेव्हा). पण बिचारी मुले इतिहास म्हणून जे शिकतात त्याने डोक्याचा भूगा होतो त्याचे काय? मोठा भाऊ शिकतो एक आणि पुढल्या वर्षी धाकटा शिकतो उलटेच? भूगोल मैलावर बदलतो हे समजते पण दैदिप्यमान असा इतिहास देखील आता मैलामैलावर बदलणार का? असे नसेल होऊ द्यायचे तर नम्र विनंति ऐका आणि तुमच्या महान कार्याचे श्रेय मिळण्यापुरते तरी पुरावे सोडाच. काय म्हणता श्रेय नव्हे कार्य महत्वाचे ? खात्रीच पटली आता. कसली काय विचारता? तुम्ही तुमच्या महान कार्यात यशस्वी होणारच याची. शुभेच्छा.
"किसी के बाप का नही" हाजिर हो..........
म्हणजे सुजाण वाचकांना त्यात मुंबईमधे महाराष्ट्र सरकारचा पगार घेणार्या पोलिस अधिकार्याचे खडे बोल ऐकलेल्या की मुंबई किसी के बाप की नही, त्यांना असे वाटते की आता असे शूर अधिकारी खरे गरजेचे आहेत जम्मू कश्मिर मधे. २०११ चा तो दुर्दैवी प्रजासत्ताक दिन जवळ आला असे अतिरेक्यांना(परकीय) वाटते आहे. कश्मिर राज्य सरकार आणि मुख्यमंत्री यांनी तणाव कमी करण्यासाठी संवेदनशील होण्याचे ठरविले आहे. म्हणजे उर्वरित भारतीयांच्या संवेदना गेल्या काश्मिरच्या ****. पण जे स्थानिक आहेत ज्यांना स्वतःवर अन्याय होत असल्याची भावना तीव्र आहे त्यांच्या भावना खुलेआमपणे दुखवल्या जाताना कोणत्या भारतीय राज्याचा जनतेचा प्रतिनिधी असे होऊ देइल ? (कोणी उत्तर दिले ते महाराष्ट्र असे? आं?) तर आता काही उपटसुंभ म्हणे देशात कुठे ही राष्ट्रध्वज फडकविणॆ (१९४७ नंतर) आणि ते देखील प्रजासत्तक दिनी हे आपले कर्तव्य नव्हे तर हक्क असे मानतात. त्या शाळकरी मुलांना उन्हात उभे करता, चित्रपटाआधी राष्ट्रध्वजाला वंदन करण्याचा कायदा करता तर असे या अल्पसंख्य उपटसुंभ स्यूडो राष्ट्रप्रेमींना वाटल्यास नवल ते काय? मग? ते निघाले उत्तरेकडे ध्वजारोहणासाठी. तर त्यांची रेल्वेगाडी रात्री २ वाजता अहमदनगरजवळ इंजिन उलटे लावून परत मागे खेचून नेण्यात सरकारला कसेबसे यश आले, नशीब. खरे तर त्या लोकांनी दवंडी पिटावी. मुंबईत. अरे कुठे आहे तो ठणकावणारा वीर ?, जाईल का आता तो सर्व भारतीयांच्या वतीने श्रीनगरला ?. "काश्मिर किसी के बाप का नही" असे उर्वरीत भारतीयांचे म्हणणे तेथील नादान राज्यकर्त्यांना ऐकवेल तर लोक त्या वीराचे पाय छत्रपति शिवाजी आंतरराष्ट्रिय विमानतळापासून धुवत त्याला डोक्यावर नाचवत वाजत गाजत फटाके उडवत सर्व आधीचा कटुपणा (मुंबई किसी के बाप की नही वगैरे) विसरून टाकतील ना?. म्हणजे आमचे जवान हौतात्म्य पत्करताना विचार करतात की आपण भारतमातेसाठी बलिदान देत आहोत. त्या पवित्र आत्म्यांना कसे काय पटेल की त्याच भूमिच्या राजधानीच्या शहरातील एका फुटकळ चौकात झेंडा लावणे राज्याच्या कायदा सुव्यवस्थेत बसत नाही आहे? तर? शोधा सर्वांनी जरा. कुठे आहेत ते माननीय पोलिस अधिकारी ? काय बरे नाव त्यांचे? आठवत देखील नाही आता.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)